Maharashtrian Breakfast : पुढारलेले राज्य असले तरी इथल्या मूळ पदार्थांची चव मातीत रुजलेली आहे. विविध ठिकाणाहून लोकं महाराष्ट्रात येऊन वसलेले असले तरी बाकी पदार्थांबरोबरच अस्सल मराठी पदार्थ जास्त लोकप्रिय आहेत.
आपल्या महाराष्ट्रातील काही लोकप्रिय नाश्त्याचे प्रकार –
पोहे :
कांदे पोहे ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय न्याहरी. करायला सोपी आणि झटपट होणारी असल्याने घरटी ही डिश नेहमी होत असते. मस्त फोडणीत तळलेले शेंगदाणे, खरपूस परतलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळलेली पोह्यांची डिश ही चटकन फस्त होते. काही शहरात तर्री पोहे, सांबर पोहे खायची पद्धत रूढ झाली आहे.
हे वाचा: देशाचा अर्थसंकल्प कसा बनवला जातो? बजेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया माहित करून घ्या...
मिसळ पाव :
अस्सल महाराष्ट्रीयन अशी ओळख असलेल्या पदार्थात मिसळीचे नाव आघाडीवर आहे. मोड आलेली मटकीची उसळ, फरसाण, शेव, बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि वरून मस्त झणझणीत तर्री असलेला रस्सा सोबत जोडीला पाव अहाहाहाहा. गल्लीतल्या टपरीपासून मोठ्या हॉटेलात सुद्धा मिळणार हा पदार्थ जागतिक पातळीवर फेमस झालेला आहे.
हेही वाचा : Down Payment and Savings Planning : घरासाठी डाऊन पेमेंट अन बचतीचे नियोजन.
साबुदाणा खिचडी :
साबुदाणा खिचडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाश्ता आहे. विशेषत: उपवासाच्या काळात खिचडीला मागणी असते. खरपूस भाजलेल्या अर्धवट भरडलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, उकलडलेल्या बटाट्याच्या काचऱ्या आणि मस्त भिजवून फुललेला साबुदाणा ह्यांच्या झकास मिश्रणाने साबुदाणा खिचडी तयार करतात.
थालीपीठ :
थालीपीठ हे ज्वारी, बाजरी आणि भाजणी पीठ यांसारख्या पिठांच्या मिश्रणाने करतात. सोबत कांदा, मेथी हिरव्या मिरच्या त्यात घालून मस्त खरपूस भाजून भरपूर तूप, लोणी सोबत खायला देतात. दह्यासोबत पण थालीपीठ भन्नाट लागते. काही ठिकाणी मिश्र पिठाचे धपाटे पण करतात आणि सोबत ठेचा आणि लोणचे असतेच.
हे वाचा: G20 Summit 2023 : G20 परिषद
वडा पाव :
तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत, पावाला आतून लावलेली चिंचेची चटणी आणि सोबत तोंडी लावायला खोबऱ्याची लसूण घातलेली चटणी आणि झकास उकडलेल्या बटाट्यात, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर आणि मसाल्यानी एकजीव केलेल्या सारणाचा गोळा डाळीच्या पिठात छान घोळवून खरपूस तळलेला वडा म्हणजे निव्वळ स्वर्गीय सुख. लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वाना आवडणारा असा हा पदार्थ आहे.
शिरा :
शिरा हा उत्तम गुलाबी भाजलेल्या रव्याचा असतो. साखर आणि वेलची पूड घालून मस्त शिजलेला शिरा नाश्त्यात वेगळीच रंगत आणतो. पूजेच्या दिवशी प्रसादासाठी केला जाणाऱ्या शिऱ्यात केळी घालतात, तर काही ठिकाणी पायनॅपल शिरा पण करतात. आंब्याच्या काळात मँगो शिरा केला जातो. नाश्त्यात तसं शिरा सोडून दुसरे काही गोड मराठी माणूस खात नाही.
करा रोज न्याहरी काळजी घेईल श्रीहरी
हे वाचा: OTT:अवघ्या 599 रुपयांत जुन्या टीव्हीवर घ्या ओटीटीचा आनंद